------------------------------------------------------------------------------------------------------------
|
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परस्थिती अंथरुणावरील आजारी रुग्णासारखी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराचा राज्यातील उमेदवारांना आलेला अलिकडील अनुभव दु:खदायक आहे. आयोगाचे एकच संकेतस्थळ असल्याने ते नेहमीच बंद पडत असून स्टाप सलेक्शन कमिशन प्रमाणे यासोबतच अजून एक संकेतस्थळाची निर्मिती करायला हवी, याप्रमाणेच "एमपीएससी'च्या कार्यप्रणालीत मोठे दोष आहेत ते प्रामाणिकपणे मान्य करून त्यांचे तातडीने निराकरण करणे आवश्यक आहे. हा एक-दोन नव्हे लाखो लोकांच्या आयुष्याशी संबंधित असतो. आयोगाची उमेदवारांसाठी हेल्पलाईन असायला हवी आहे तसेच गेल्या अनेक दिवसापासून आयोग किंवा महाऑनलाईन च्या दूरध्वनीवर कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. आयोग किंवा महाऑनलाईन ची कोणतीही हेल्पलाईन चालू नसल्याने हजारो उमेदवारांचे भवितव्य धोक्यात आले आहे. आयोगाच्या अध्यक्षांनी व सचिवांनी परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली व हाताळत आहेत त्यासंबंधीही वरिष्ठ पातळीवर विचारमंथन होणे आवश्यक आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी आयोगाने खबरदारी घ्यावी. परीक्षेचे फॉर्म ऑनलाइन भरले जाताना विपरीत परिस्थिती उद्भवली तर ती हाताळण्यास संगणक क्षेत्रातील तज्ञ आयोगाकडे उपलब्ध असले पाहिजेत, विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर त्वरित सोडविण्यासाठी मदत कक्ष किंवा हेल्पलाइन कार्यक्षम बनविणे आवश्यक आहे. संघ लोकसेवा आयोगासंदर्भात काही प्रश्न उद्भवल्यास भारतातील कोणत्याही भागातून फोन केल्यास त्या विद्यार्थ्यांचे तत्काळ समाधान केले जाते. सध्याच्या वेबसाइटमध्ये अनेक त्रुटी आहेत त्या दुरुस्त करून ही सर्व प्रक्रिया सुटसुटीत व कालबद्ध असणे आवश्यक आहे. "एमपीएससी'कडून सरकारला माहिती वेळेवर पोचत नाही, की सरकारकडून पुढची कार्यवाही वेळेत पूर्ण केली जात नाही? कोणास ठाऊक! एकूणच, "एमपीएससी'ची परिस्थिती अंथरुणावर असलेल्या आजारी रुग्णासारखी आहे. तज्ज्ञ व्यक्तींकडून याची तातडीने चिकित्सा व्हावी अशीच उमेदवारांची अपेक्षा आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
परळीच्या भामट्याने 'सीआरपीएफ'मध्ये नोकरीच्या आमिषाने तरुणांना ४७ लाख रुपयांना गंडविले
'सीआरपीएफ'मध्ये नोकरी लावून देण्याच्या आमिषाने बेरोजगारांना तब्बल ४७ लाख ५० हजार रुपयांना गंडविणाऱ्या परळी वैजनाथ (जि. बीड) तालुक्यातील भामट्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रांजणगाव (शेणपुंजी) येथे शिवाजी मुकुंदराव सोनटक्के (वय ३२) यांच्या सलूनमध्ये रमेश संभाजी सावंत वेळोवेळी येत होता. त्याने आपला जावई सीआरपीएफमध्ये नोकरीस असून त्यांची बदली औरंगाबादला झाल्याचे सांगितले. त्यांना तुमची खोली भाड्याने द्यावी, अशी विनंतीही केली. श्री. सोनटक्के यांनी होकार देत रांजणगाव येथील खोली मार्च २०१२ मध्ये १३०० रुपये महिन्यानुसार धम्मपाल शिवाजी टोम्पे (वय २६, रा. दाऊतपूर, ता. परळी वैजनाथ, जि. बीड) यास भाड्याने दिली. या ठिकाणी धम्मपाल हा पत्नी वर्षा व चार वर्षांच्या मुलासह राहत होता. पोलिसांप्रमाणे बारीक कटिंग, हातात फायबरची काठी, बनावट ओळखपत्र व सीआरपीएफच्या गणवेशातील फोटो आदींतून आपण खरोखरच सीआरपीएफचा जवान असल्याचे धम्मपाल भासवीत होता. त्यामुळे त्याचा परिसरातील नागरिकांशी संपर्क वाढला. सुरवात घरमालकापासूनच करून धम्मपालने घरमालक सोनटक्के यांना विश्वासात घेऊन सिकंदराबाद येथे सीआरपीएफच्या जागा निघाल्या असून भरती करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझे चांगले संबंध असल्याचे भासविले. तुमच्या नातेवाइकांपैकी कोणाला नोकरी लावायची असेल तर प्रत्येकी अडीच लाख रुपये लागतील, असे सांगितले. तसेच आपल्यातील संभाषणाची चर्चा करू नका, मोबाईलवर माझ्याशी संपर्क साधू नका, फोन रेकॉर्ड होत असतात, अशी बतावणीही धम्मपालने केली. सलूनचालक सोनटक्के यांचा यावर विश्वास बसला व त्यांनी आपल्या गावाकडील तसेच रांजणगावातील मित्राकडून सुमारे तीन लाख रुपये जमा केले. तसेच आपला ऍपेरिक्षा विकून उर्वरित दोन लाख असे एकूण पाच लाख रुपये सोनटक्के यांनी स्वतःला न्हावी पदावर व पत्नीला शिंपी पदावर नोकरीला लावण्यासाठी भामटा धम्मपालला दिले. चेक देऊन विश्वास संपादन करण्याची पद्धत त्याने वापरून सलूनचालक शिवाजी सोनटक्के यांनी पाच लाखांची रोख रक्कम देताच धम्मपालने परळी येथील आयडीबीआय शाखेचा चेक क्रमांक ०३०६९६ दिला. मी जर तुम्हाला नोकरीला लावू शकलो नाही तर या चेकद्वारे तुमचे पैसे परत घ्या, असे सांगितल्याने सोनटक्के यांचा धम्मपालवरील विश्वास आणखी वाढला आणि सोनटक्के यांचे नातेवाईक देवानंद पांडुरंग सोनटक्के, बंडू मुरलीधर गुळगुळे, गजानन मुरलीधर गुळगुळे, संतोष मुरलीधर गुळगुळे यांच्याकडून अडीच लाख रुपयांप्रमाणे १० लाख रुपये रोख धम्मपाल याने घेऊन त्यांनाही परळीतीलच आयडीबीआय शाखेचा चेक क्रमांक ०३०६९७ व ०३०६९८ असे दोन चेक दिले. रोख रक्कम मिळताच धम्मपाल चेक व समन्सपत्रक देत होता आणि दुसरे पत्रक मिळताच तुम्हाला नोकरी लागेल, असे सांगून विश्वास संपादन करत होता. यानंतर सोनटक्के यांचे मित्र शेख सत्तार यांनीही आपल्या मुलांकरिता अडीच लाख रुपये धम्मपालला दिले. अजय रमेश शिंदे यानेही पैसे दिले. वाळूज महानगरातील अशा एकूण नऊ तरुणांकडून पैसे घेऊन त्यांनाही समन्स पत्र व चेक धम्मपालने दिले. परळीतील अनेक बेरोजगार तरुणांचीही या भामट्याने अशीच फसवणूक केली. सर्वांचे मिळून तब्बल ४७ लाख ५० हजार रुपये घेऊन धम्मपाल अचानक काही दिवसांपूर्वी कुटुंबासह गायब झाला. त्यामुळे घाबरलेले शिवाजी सोनटक्के धम्मपालच्या गावी गेले. त्या ठिकाणी गावकऱ्यांनी धम्मपालने आम्हालाही नोकरीचे आमिष दाखवून फसविल्याचे सांगितले. तसेच धम्मपाल स्वतःच बेरोजगार असल्याचे कळताच भांबावून गेलेल्या सोनटक्के यांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार धम्मपाल टोम्पेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधार्थ गेलेल्या पथकातील फौजदार सुरेश खाडे, हेड कॉंस्टेबल बाळासाहेब आंधळे व उमाकांत चौधरी यांनी परळी ग्रामीण पोलिसांच्या मदतीने धम्मपालला गुरुवारी (ता. २५) दुपारी ताब्यात घेतले. या प्रकरणी जावयास मदत करणाऱ्या रमेश संभाजी सावंत यालाही चौकशीकरिता ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास फौजदार सुरेश खाडे करीत आहेत. (सौजन्य- सकाळ)
------------------------------------------------------------------------------------------------------------
|
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधीक्षक ( शिक्षण सेवा) पदाच्या २७ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधीक्षक, उच्च शिक्षण संचनालय, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (प्रशासकीय सेवा-मंत्रालयीन संवर्ग) च्या २७ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०१३ आहे.
|
अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
दत्ता सांगोलकर, श्रद्धा नोट्स व लक्ष्यवेध यांची चालू घडामोडी नवीन आवृत्ती बाजारात उपलब्ध
सध्या स्पर्धा परीक्षांची मोठा प्रमाणात रेल-चेल असून त्यासाठी विविध प्रकाशन ची स्पर्धा परीक्षांची पुस्तके प्रकाशित झाली असून नुकतीच दत्ता सांगोलकर, श्रद्धा नोट्स आणि लक्षवेध यांनी चालू घडामोडी ची आपली नवीन आवृत्ती प्रकाशित केली असून अनुक्रमे 65/-, 80/- आणि 55/- रुपये अशी त्यांची किंमत असून अगदी वेळेत नवीन आवृत्ती बाजारात उपलब्ध झाल्याने उमेदवारांकडून या पुस्तकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.